सिल्लोड, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य पेन्शनग्रस्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने ५ मार्च रोजी आझाद मैदान येथे जुनी पेन्शन लक्षवेधी धरणे आंदोलन यशस्वी झाले. या आंदोलनास आ. ज्ञानेश्वर म्हात्रे, आ. ज. मो. अभ्यंकर, आ. विक्रम काळे, आ. जयंत आसगावकर आ. सुधाकर अडबाले, आ. किरण सरनाईक, आ. अभिजीत वंजारी तसेच पेन्शन लढ्याचे संगीता शिंदे, प्रशांत पगार यांनी संघटनेचे निवेदन स्वीकारून न्यायिक मागण्या सविस्तर जाणून घेतल्या.
पेन्शन पीडित बांधव, मयत कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय अनेक संघटनांचे कार्यकर्ते व पदाधिकारी बहुसंख्येने आझाद मैदान वरती उपस्थित होते. आंदोलन खऱ्या अर्थाने लक्षवेधी ठरल कारण बहुसंख्य शिक्षक आणि पदवीधर यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रती श्रद्धांजली अर्पण करून पुढील रणनीती जाहीर केली.
आमदार विक्रम काळे यांनी संघटनेच्या कार्यपद्धचे कौतुक करून नेहमीच संघटनेच्या मदतीस तयार असल्याचे जाहीर केले.
सर्वच आमदारांनी लवकरच यासंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत संघटनेच्या न्याय मागण्या पोचविण्याचे आश्वासित केले. संघटनेबरोबर मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, सचिव यांच्याबरोबर बैठक आयोजित करण्यासाठी सामुदायिक प्रयत्न करणार असल्याचे जाहीर केले.
शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांच्या बरोबर मंत्रालय येथे सविस्तर चर्चा करून निवेदन दिले. चर्चमध्ये राज्याध्यक्ष विजय शिरोळकर, सचिव भास्कर देशमुख, कोषाध्यक्ष तानाजी शेळके राज्य समन्वयक रणजीत तावरे यांनी भाग घेतला. मंत्री महोदय यांनी हा प्रश्न वरिष्ठांच्या पर्यंत पोहोचवून बैठक घेण्याचे अश्वासीत केले. शिक्षण विभागाचे प्रशासकीय अधिकारी चुकीची माहिती मंत्री महोदयांना सांगत आहेत. सत्य माहिती लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. याबद्दल अध्यक्षांनी शिक्षण मंत्र्यांच्याकडे नाराजी व्यक्त केली.
सदर चर्चेचा वृत्तांत संघटनेने शिक्षक आमदार महोदयांच्याकडे मांडला असून पिडीताना न्याय द्यावा ही आग्रहाची मागणी केली. आहे. २६ फेब्रुवारी २०२६ च्या औरंगाबाद खंडपीठाच्या निकाल पत्रामध्ये प्रशासनाने चुकीची माहिती न्यायालयात सादर केल्यामुळे न्यायालयाने दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे याची माहिती चर्चेदरम्यान दिली. २००५ पूर्वी नियुक्त बांधवांच्या बाबतीत एक महिन्यांमध्ये अपेक्षित निर्णय नाही झाला तर आमरण उपोषणाचा निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य पेन्शनग्रस्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी तन मन धन अर्पण करून सर्व शक्तीनिशी लढा देत असल्याचे प्रकर्षाने जाणवले. सदर आंदोलनाचे नेतृत्व अध्यक्ष प्रा. विजय शिरोळकर, कार्याध्यक्ष प्रा. योगेश्वर निकम, उपाध्यक्ष संपर्क कदम, सचिव भास्कर देशमुख, सहसचिव सुनील कांबळे, तानाजी शेळके, मारोती खेडकर, निशिकांत कडू, राजू लहासे, डॉ. गोविंद गोडसे, प्रा. रणजीत तावरे, प्रा. मधुकर कांबळे आदीनी केले.











