मुंबई: राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रचारासाठी आता अवघे १०-१२ दिवस शिल्लक आहेत. तर, दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठीच्या तिसर्या टप्प्यासाठी राज्य निवडणूक आयोगात हालचालींना वेग आला आहे. जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची तयारी जवळपास अंतिम टप्प्प्यात आली असून मोठी अपडेट समोर आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपर्यंत घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. निवडणुकांच्या तारखा निश्चित करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने ६ आणि ७ जानेवारी रोजी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आवश्यक असलेल्या ईव्हीएम उपलब्ध असल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिली आहे. मात्र, सध्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये गुंतलेले मनुष्यबळ मोकळे झाल्यानंतरच जिल्हा परिषदांसाठी मतदानाची प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यामुळे मतदानाच्या अंतिम तारखांवर आयोगाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
या बैठकीला जिल्हा परिषदांचे संबंधित अधिकारी तसेच पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. निवडणूक प्रक्रियेतील कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीनेही सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.
मतदान कधी?
ओबीसी आरक्षणासंदर्भातील निर्णयामुळे राज्यातील केवळ १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांमध्येच निवडणुकीचा मार्ग मोकळा आहे. ज्या ठिकाणी ५० टक्क्यांची आरक्षण मर्यादा ओलांडली गेली आहे, तेथे इतर समाजघटकांवर अन्याय होऊ नये म्हणून निवडणुका स्थगित ठेवण्यात आल्या आहेत.
जिल्हा परिषद निवडणुकांचे मतदान २५ जानेवारीच्या आसपास होण्याची दाट शक्यता आहे. आचारसंहितेचा कालावधी लक्षात घेऊन मतदानाच्या तारखा ठरवण्यात येणार असून, २५ जानेवारी ही तारीख अडचणीची ठरल्यास २८ जानेवारी रोजी मतदान घेण्याचाही पर्याय चर्चेत आहे. २८ जानेवारी हा बुधवार असल्याने त्या दिवशी मतदान घेणे मतदारांसाठी अधिक सोयीचे ठरेल, असे मतही व्यक्त करण्यात येत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, ८ महानगरपालिका आणि काही जिल्हा परिषदांचे क्षेत्र समान असल्याने सध्या आचारसंहिता लागू करण्यात आलेली नाही. मात्र, ६ आणि ७ जानेवारीच्या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.