मुंबई : उबाठा गटाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट होत आहे. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, यामुळे ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीचे संकेत मिळत आहेत. एकीकडे दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणुका लढवणार असल्याचा नारा देत असतानाच, उद्धव ठाकरे यांनी थेट राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क सुरू झाले आहेत. ही भेट केवळ सदिच्छा भेट नसून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण चर्चा करण्यासाठी झाल्याचे मानले जात आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही नेत्यांमध्ये जागावाटपावरून संभाव्य चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. विशेषतः, आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट खूप महत्त्वपूर्ण आहे. महापालिका निवडणुकीत जागावाटपाची नेमकी रणनीती काय ठेवायची, यावर विचारविनिमय करण्यासाठीच ही बैठक झाली असल्याचे बोलले जात आहे. राज्यात सत्तासंघर्ष शिगेला पोहोचलेला असताना ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची शक्यता निर्माण होणे, ही विरोधी पक्षांसाठी मोठी धोक्याची घंटा ठरू शकते.
दुसर्या आणि तिसर्या फळीतील नेत्यांशिवाय ही भेट होत आहे. दोन्ही भावांमध्ये जागावाटपावरुन संभाव्य चर्चा होणार असल्याची माहिती मिळाली आहे. ठाकरे बंधूंची युती होणार असे संकेत दिसत असले तरीसुद्धा याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. असं झालं तर महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि आगामी निवडणुकांवर याचा मोठा परिणाम होणार असल्याचं बोललं जात आहे. या महत्त्वपूर्ण भेटीनंतर दोन्ही पक्षांचे पुढील पाऊल काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
२२७ जागांमध्ये मनसेला किती जागा?
२२७ जागा असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेला महत्त्वाच्या जागा हव्या आहेत. यापूर्वी उद्धव ठाकरे सेनेतील नेते आणि मनसेतील नेते यांच्यात चर्चेची एक फेरी झाल्याचे समजते. पण त्यात काही जागांवरून मतभिन्नता दिसून आली. काही जागांवर दोन्ही पक्ष आग्रही असल्याने तिढा निर्माण झाला. या बैठकीत कोणताही सकारात्मक तोडगा निघाला नसल्याचे समजते. त्यानंतर जागा वाटपात पेच निर्माण झाल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी आता उद्धव ठाकरे स्वतः राज ठाकरे यांच्या भेटीला शिवतीर्थावर आल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. मनसे आणि उद्धव सेना यांच्यात ७५ जागांवर खलबतं सुरू असून त्यावर तोडगा काढण्याची कसरत करावी लागणार असल्याचे समजते.