विधानपरिषदेसाठी जे नाव येईल त्यासाठी आमचं सहकार्य असेल , शरद पवारांकडून उद्धव ठाकरेंना मोठा 'शब्द'

Foto
मुंबई : राज्यातील आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत  उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या पाठिंब्याची आता ज्येष्ठ नेते शरद पवार 'परतफेड' करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. "विधानपरिषदेसाठी उद्धव ठाकरे जे नाव देतील, त्याला आमच्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा असेल," अशी ग्वाही शरद पवार यांनी दिली आहे.

पवारांची अनौपचारिक गप्पांमध्ये माहिती
पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, "माझ्या राज्यसभेच्या निवडीवेळी महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी मदत केली. ठाकरे उमेदवारीसाठी जे नाव देतील, त्यासाठी आमचे सहकार्य आणि पाठिंबा राहील, असे त्यांनी म्हटले आहे. 

संख्याबळाचे गणित आणि जागेसाठी रस्सीखेच
विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक होणार आहे. विधानसभेतील सध्याचे संख्याबळ पाहता महायुतीच्या वाट्याला 8 जागा, तर महाविकास आघाडीच्या वाट्याला केवळ 1 जागा येण्याची शक्यता आहे. या एका जागेसाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू होती. मात्र, शरद पवारांच्या या विधानामुळे ही जागा आता 'ठाकरे गटा'च्या पदरात पडणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. खुद्द उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषद सदस्यत्वाची मुदत संपत असल्याने, ते स्वतः उमेदवार असतील की अन्य कोणाला संधी देतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शरद पवार 6 एप्रिलला घेणार शपथ
दरम्यान, शरद पवार यांची राज्यसभा खासदार म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. या पदाचा शपथविधी येत्या 6 एप्रिल रोजी दिल्लीत पार पडणार आहे. त्यासाठी शरद पवार उद्या (रविवार) दिल्लीकडे रवाना होणार असल्याची माहिती मिळत आह.

बारामती पोटनिवडणुकीचा पेच अद्यापही कायम
एकीकडे विधानपरिषदेत एकी दिसत असताना, बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीवरून मात्र पेच निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी 'मातोश्री'वर फोन करून उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठिंब्याची मागणी केली आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी इच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि भाजपने ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले असले तरी, काँग्रेसने दोन्ही जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. बारामती पोटनिवडणुकीबाबत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी अद्याप आपले पत्ते उघड केलेले नाहीत, त्यामुळे बारामतीचा रणसंग्राम बिनविरोध होणार की चुरशीचा? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.