नवी दिल्ली : आखाती देशांमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाने आपल्या ऑपरेशन संकल्प अंतर्गत एक मोठी मोहीम यशस्वी केली आहे. इराण आणि अमेरिका-इस्रायल संघर्षा मुळे होर्मुजची सामुद्रधुनी धोक्याची बनली असताना, भारतीय नौदलाने भारताकडे येणाऱ्या एलपीजी टँकर्सना चोख सुरक्षा पुरवत ओमानच्या आखातातून सुखरूप बाहेर काढले आहे.
भारतीय नौदलाच्या युद्धनौकांनी शिवालिक आणि नंदा देवी या दोन महत्त्वाच्या एलपीजी टँकर्सना एस्कॉर्ट केले. हे दोन्ही टँकर्स भारतात स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. होर्मुजच्या सामुद्रधुनीतून बाहेर पडत असताना होर्मुझच्या तोंडावर भारतीय युद्धनौका या दोन्ही टँकर्सची वाट पाहत होत्या. इराणच्या शब्दानुसार या दोन टँकर्सनी होर्मुझ पार करताच या जहाजांना भारतीय नौदलाने आपल्या संरक्षणाखाली घेतले, जेणेकरून कोणत्याही संभाव्य हल्ल्याचा किंवा अडथळ्याचा धोका टाळता येईल.
दहशतमुक्त व्यापार
आखाती क्षेत्रात युद्धजन्य परिस्थिती असतानाही भारताने आपला ऊर्जा पुरवठा विस्कळीत होऊ दिलेला नाही. इराणने भारताच्या जहाजांना मार्ग देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र तरीही खबरदारीचा उपाय म्हणून नौदलाने ही सुरक्षा पुरवली. भारतीय नौदलाचे आयएनएस विशाखापट्टनम सारखे आधुनिक युद्धनौका या भागात सतत गस्त घालत असून भारतीय नाविकांच्या सुरक्षेची खात्री करत आहेत. या मोहिमेमुळे भारतात एलपीजीची टंचाई भासण्याची शक्यता आता पूर्णपणे मावळली असून, भारताच्या सागरी सामर्थ्याची जगभरात चर्चा होत आहे.