राज्यभरातल्या धरणांची स्थिती काय? किती विसर्ग ? मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती ....

Foto
मुंबई : मराठवाड्यातील पूरस्थिती आणि राज्यातील विविध धरणांचा विसर्ग याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. काल रात्री सुद्धा ते स्थानिक प्रशासन आणि जलसंपदा विभागाच्या संपर्कात होते. आज सकाळी पुन्हा त्यांनी जलसंपदा विभागाकडून एकूणच राज्याच्या स्थितीचा आढावा घेतला.

जायकवाडी धरणातून १ लाख ८८ हजार क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. सुदैवाने पाऊस बंद झाल्याने आता विसर्ग वाढविण्याची गरज नाही. आज रात्री ८ पर्यंत हे पाणी नांदेडपर्यंत पोहोचेल. सर्व संबंधित जिल्हाधिकार्‍यांना यंत्रणा सतर्क ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

येलदरी धरणातून 29,400 क्युसेक इतका विसर्ग होतो आहे आणि तो पूर्णपणे नियंत्रणात आहे. मांजरा आणि तेरणा नद्यांचा पूर आता ओसरला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील स्थिती नियंत्रणात आहे. उजनीतून 75,000 इतका विसर्ग होत असून, सीना कोळेगावमधून 80,000 क्युसेक इतका विसर्ग होतो आहे.

नाशिक- गंगापूर धरणातून 11,000 क्युसेक इतका विसर्ग होत असून, मुळा धरणातून 10,000 क्युसेक विसर्ग सुरु आहे. पाऊस आता कमी झाला आहे. 

जायकवाडी धरणातून नाशिक, नगर भागातील धरणातून विसर्ग 87,000 वरुन 68,000 क्युसेकवर नियंत्रित केला आहे.

जळगाव जिल्ह्यातील गिरणा धरणातून 54,500 क्युसेक इतका विसर्ग सुरु असून, हतनूर धरणातून 65,800 क्युसेक इतका विसर्ग सुरु आहे. कोकणातील सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली आहेत.