भोंदू अशोक खरातांकडे जाणारे ते 40 आमदार कोण? तो कोणाला भेटायला दिल्लीला जायचा? विमानाची व्यवस्था कोणी केली, सगळं बाहेर आलं पाहिजे, राऊतांची मागणी

Foto
मुंबई: नाशिकमधील भोंदू अशोक खरातला विमानांची सोय करून देणारे सरकारमधील ते बडे नेते कोण? असा रोखठोक सवाल करत शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत  यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. खरातकडे 40 आमदार जात असल्याचा दावा खुद्द दीपक केसरकर यांनीच केला आहे, त्यामुळे आता त्या 40 आमदारांची नावे जाहीर करण्याची मागणी राऊत यांनी केली असून, या प्रकरणात राजमान्यता देणाऱ्या मंत्र्यांवर फडणवीसांनी बोलावे, असे आव्हानही त्यांनी दिले आहे.

सत्ताधारी आमदार दीपक केसरकर म्हणतात की मला एकट्यालाच का टार्गेट करता आहात, खरातकडे 40 आमदार जात होते, हे 40 आमदार कोण हे पुढे आले पाहिजे, असे खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. खरातसाठी विमानांची सोय करणारे सरकारमधील कोण लोकं होते हे जाहीर केले पाहिजे, अशी मागणीही राऊत यांनी केली आहे.

संजय राऊत म्हणाले की, खरात दिल्लीमध्ये जात कोणाला भेटत होत हे जर पोलिस तपासात निष्पन्न झाले असेल तर ते समोर आले पाहिजे. अशोक खरात यांचा वावर सर्वत्र होता. सरकारने त्याला राजमान्यता दिली होती. ज्यांनी त्यांना राजमान्यता दिली ती लोकं फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आजही आहेत, फडणवीसांनी त्यावर बोलावे. एखाद्या समाजाच्या मंदिरासाठी मंत्री जर वेगळी ववस्था करत असतील तर त्यावर आम्ही टीका करणार नाही. नरेंद्र मोदी यांनी जी चूक केली ती देवेंद्र फडणवीयांनी करू नये. त्यांनी विरोधी पक्षातील नेत्यांनासोबत घेत यावर बैठक घ्यावी. विरोधी पक्षनेता नेमावा तरच टीम महाराष्ट्र तयार होईल, असंही राऊत यावेळी बोलताना म्हणालेत.

झिरवाळ यांचा व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबत प्रतिक्रिया
संजय राऊत म्हणाले की, मंत्री झिरवाळ यांचा व्हायरल झालेल्या व्हिडिओची पडताळणी कशी करणार. मुख्यमंत्री किरीट सोमय्यांच्या व्हिडिओची सत्यता तपासणार होते, असे ते बोलले होते. पण ती सत्यता पडताळली पाहिजे. विरोधी पक्षाबद्दल असे काही घडले असते तर सरकारने आधी फाशी मग चौकशी ही भूमिका घेतली असती. इथे फाशीचे नावच नाही, करू चौकशी सुरू आहे, असंही राऊतांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान, मुख्यमंत्री जर सांगत असतील लॉकडाऊन लागणार नाही तर ती चांगली गोष्ट आहे, तर त्यांचे स्वागत केले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीम इंडियामध्ये कोण आहे हे सुद्धा त्यांनी सांगितले पाहिजे. का केवळ मोदी आणि अमित शहाच त्यामध्ये आहेत. जर महाराष्ट्रात टीम करायची असेल तर विरोधकांना विश्‍वासात घेतले पाहिजे. दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेता नेमला पाहिजे. इराणमधील जनतेसाठी देशभरातील लोकांनी पैसे जमा करत त्यांना 500 कोटीची मदत केली आहे. सरकारने मदत केलेली नाही. पश्‍चिम बंगालमध्ये भाजपने काहीही केले तरीही तिथे ममता बॅनर्जीच जिंकणार असा विश्‍वास राऊत यांनी व्यक्त केला आहे.