नवी दिल्ली : राज्यसभेतील ३७ सदस्यांचा कार्यकाळ २ एप्रिल रोजी संपत आहे. या रिक्त होणार्या जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. ३७ पैकी काँग्रेसच्या चार सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे, मात्र होऊ घातलेल्या निवडणुकीत काँग्रेसचे पाच सदस्य निवडून जातील अशी राजकीय समीकरणे दिसत आहेत.
काँग्रेसचे अभिषेक मनु सिंघवी, केटीएस तुलसी, फुलो देवी नेताम आणि रजनी पाटील यांचा राज्यसभा सदस्यत्वांचा कार्यकाळ संपत आहे. कायदेतज्ज्ञ असलेल्या अभिषेक मनु सिंघवी यांना पुन्हा तेलंगानामधून राज्यसभेवर पाठवले जाणार असल्याची जास्त शक्यता आहे.
तेलंगानामध्ये काँग्रेसला आणखी एक जागा मिळू शकते. तेलंगानामध्ये एक उमेदवार निवडून येण्यासाठी ४० मतांचा कोटा आहे. तेलंगानामध्ये काँग्रेस ७६ मते आहेत. त्यामुळे दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी काँग्रेसला फक्त चार जास्तीची मते हवी आहेत. त्यात सत्तेत असलेल्या काँग्रेससमोर फार अडचणी दिसत नाहीत.
माजी न्यायमूर्तींना राज्यसभेत पाठवणार?
सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना तेलंगानातून राज्यसभेवर पाठवले जाणार असल्याचे बोलले जात आहे. जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर झालेल्या निवडणुकीत इंडिया आघाडीने बी. सुदर्शन यांना उमेदवार म्हणून पुढे आणले होते. दरम्यान अशीही चर्चा आहे की, काँग्रेसकडून तेलंगानातून एखाद्या अल्पसंख्यांक नेत्याला राज्यसभेत पाठवले जाऊ शकते.
छत्तीसगडमध्ये काँग्रेसला एक खासदार होणार कमी
गेल्यावेळी काँग्रेसच्या छत्तीसगडमधून दोन जागा निवडून आल्या होत्या. पण, यावेळी काँग्रेसला एकच जागा मिळेल अशी असणारी त्याठिकाणी परिस्थिती आहे. त्यामुळे केटीएस तुलसी यांना पुन्हा राज्यसभेत वापसी करणे कठीण मानले जात आहे.
आदिवासी समुदायाचे प्रतिनिधीत्व करणार्या फुलो देवी नेताम यांना काँग्रेसकडून पुन्हा संधी दिली जाणार की, त्यांचा पत्ता कट करून माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल किंवा माजी उपमुख्यमंत्री टीएस सिंह देव यांना राज्यसभेत पाठवले जाण्याचीही चर्चा आहे.
हिमाचल प्रदेशात काँग्रेससमोर पेच
काँग्रेससमोर हिमाचल प्रदेशमध्ये पेच असणार आहे. पक्ष वरिष्ठ नेते आनंद शर्मा यांना संधी देणार की, माजी प्रदेशाध्यक्षा प्रतिभा सिंह यांना राज्यसभेत पाठवणार, अशी चर्चा आहे. मोठ्या नेत्यांना संधी देण्याऐवजी पक्ष स्थानिक नेत्याला संधी देऊ शकतो, अशीही चर्चा आहे. हिमाचल प्रदेशात काँग्रेसचे ४० आमदार आहे आणि एका उमेदवार निवडून येण्यासाठी ३५ मतांची गरज आहे.
हरयाणात कोणाला संधी देणार?
हरयाणामध्ये काँग्रेसला एक जागा मिळेल अशी समीकरणे आहेत. भूपेंद्र सिंह हुड्डा हे ज्याची शिफारस करतील त्यालाच तिकीट मिळेल, अशी राजकीय स्थिती तिथे आहे. हुड्डा गटातील राज बब्बर किंवा उदयभान या दोन नेत्यांची नावे सध्या स्पर्धेत आहेत. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय आणि काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे प्रमुख अनिल जयहिंद यांनाही उमेदवारी दिली जाऊ शकते.
काँग्रेस या दोन नेत्यांना राज्यसभेत पाठवण्याची शक्यता
हरयाणा आणि हिमाचल प्रदेश या दोन राज्यातून नवीन नेत्यांनाही संधी दिली जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या मीडिया विभागाचे प्रमुख पवन खेरा आणि सोशल मीडिया प्रभारी सुप्रिया श्रीनेत यांची नावे स्पर्धेत आहेत.
महाराष्ट्रात काँग्रेस, उद्धवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) हे तिन्ही पक्ष मिळून एकच उमेदवार निवडून आणू शकतात. शरद पवार पुन्हा राज्यसभेवर जाणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे काँग्रेसला एकही उमेदवार निवडून देता येणार नाही.