छत्रपती संभाजीनगर : मुंबई-गोवा महामार्गावरील खासगी बसमध्ये एका महिलेचा दोनवेळा विनयभंग झाल्याने संताप व्यक्त होत आहे. स्वत: आमदार अंबादास दानवे यांनी ट्विट करुन सरकारला प्रश्न केला आहे. यामुळे गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या एका खासगी बसमधील महिला प्रवाशाचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रवासादरम्यान बसच्या क्लिनरने दोन वेळा महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप या महिलेने केला आहे.
या प्रवासादरम्यान संगमेश्वर इथं पहिल्यांदा झोपेतून उठवण्याच्या बहाण्याने आणि नंतर पोलादपूर इथं विनयभंग केल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. पीडित महिलेने रात्री तात्काळ पोलिसांच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधत तक्रार दाखल केली. त्यानंतर, रायगडमधील कोलाड पोलिसांनी हा गुन्हा नोंदवून पुढील तपासासाठी प्रकरण संगमेश्वर पोलीस ठाण्याकडे वर्ग केले आहे. दरम्यान पीडित महिला ही संभाजीनगर परिसरातील असून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे. सरकारने लाडकी बहीण नावापुरती न म्हणता या महिलेच्या पाठीशी उभं रहावं, अशी मागणी त्यांनी केली आहे.
अंबादास दानवेंचा थेट इशारा
गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या राजधानी ट्रॅव्हल्स कॉर्पोरेशनच्या एमएच-43-सिके-2981 क्रमांकाच्या बसमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या एका महिला प्रवाशाला रात्री साडेतीनच्या सुमारास बसच्या स्टाफकडूनच तब्बल तीन वेळा त्रास दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. महिला प्रवाशांच्या सुरक्षेशी खेळणाऱ्या या मुजोर स्टाफला धडा शिकवण्यासाठी संबंधित बस आता कोलाड (जि. रायगड) पोलिस ठाण्यात वळवण्यात आली आहे. ‘लाडकी बहीण’ म्हणणे केवळ घोषणांपुरते मर्यादित राहू नये, या महिलेच्या पाठीशी सरकार आणि पोलिस ठामपणे उभे आहेत, हे कृतीतून दाखवून द्यावे, अशा शब्दात अंबादास दानवेंनी या घटनेवर संताप व्यक्त केला. तसेच, या प्रकरणात महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. अन्यथा गाठ आमच्याशी आहे, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.















