नवी दिल्ली- काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी हैदराबाद येथे एका वृत्तपत्राला दिलेली मुलाखत ही पेड न्यूज होती. पेड न्यूज देऊन राहुल यांनी मतदारांना काँग्रेसकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप भाजपने केला आहे. याप्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते मुख्तार अब्बास नकवी यांनी निवडणूक आयोगाकडे राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
राहुल गांधी
यांनी ६ डिसेंबर रोजी एका
वृत्तपत्राला एक मुलाखत दिली होती. ही पेड न्यूजच होती. त्यातून मतदारांना
काँग्रेसकडे आकर्षित करण्याचा व त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
त्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली असून कारवाईची मागणी केली आहे, असे नकवी यांनी
सांगितले. राहुल यांनी या मुलाखतीत एका सर्वेक्षणाचा हवाला देऊन पाचही राज्यात
काँग्रेसची सत्ता येणार असल्याचा आणि भाजपचा पराभव होण्याचा दावा केला होता.
ही मुलाखत पेड
न्यूजच्या श्रेणीत येते. नियमानुसार मतदानाच्या ४८ तास आधी कोणीही
निवडणूक प्रचार करू शकत नाही किंवा मुलाखत देऊ शकत नाही. मात्र, राहुल यांनी
जाणूनबुजून मुलाखत देऊन मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप नकवी
यांनी केला. यावेळी नकवी यांच्यासोबत केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा हेही उपस्थित
होते.