नवी दिल्ली – राम मंदिरावर आता योगगुरु रामदेव यांनी म्हटले आहे, की न्यायालयाच्या निर्णयाला उशिर होत असेल तर संसदेत विधेयक मांडले जाईल. रामदेव म्हणाले की असे विधेयक आता आणावेच लागेल. रामजन्मभूमीवर रामाचे मंदिर नाही तर मग कोणाचे बनेल, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. रामदेव म्हणाले, की संतांनी आणि रामभक्तांनी आता संकल्प केला आहे की आता राम मंदिराला आणखी उशिर झाला नाही पाहिजे. आम्हाला आशा आहे की या वर्षातच देशाला शुभ समाचार ऐकायला मिळेल.
दुसरीकडे, रामजन्मभूमी
न्यासाचे अध्यक्ष राम विलास वेदांती यांनी दावा केला आहे की राम मंदिराचे काम डिसेंबरपर्यंत
सुरु होईल. त्यांचे म्हणणे आहे की अध्यादेशाशिवाय दोन्ही बाजूंच्या सहमतीने
मंदिराचे बांधकाम सुरु होईल. ते म्हणाले, अयोध्येत राम मंदिर होईल आणि लखनऊमध्ये
मशिद होईल.
सुप्रीम कोर्टाने अयोध्येची
सुनावणी अनिश्चित काळासाठी टाळली आहे. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सरकारकडे
मागणी केली आहे की कायदा करुन जमीन अधिग्रहण करावे आणि मंदिर निर्माणाचा मार्ग
मोकळा करावा. शुक्रवारी मुंबईत झालेल्या संघाच्या पत्रकार परिषदे संघाचे कार्यवाहक
भय्याजी जोशी यांनी गरज पडली तर १९९२ सारखे आंदोलन करण्याचीही तयारी असल्याचे
म्हटले आहे.
भाजपचे राज्यसभेतील खासदार
राकेश सिन्हा यांनी राम मंदिरासाठी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात खासगी विधेयक
आणण्याची घोषणा केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राम मंदिराचा
मुद्दा अधिक तापण्याची चिन्ह दिसत आहेत.