बांगलादेशी व पाकिस्तानी घुसखोरांना हाकलण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आज मुंबईत काढलेल्या मोर्चाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. मनसेचा खरोखरच हा मोर्चा महामोर्चा झाला. महाराष्ट्राच्या जिल्ह्याजिल्ह्यातून हजारोंच्या संख्येनं आलेले कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. राजकीय भूमिका बदलल्यानंतर झालेल्या या पहिल्याच मोर्चात मनसेनं आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली. या विराट मोर्चामुळं मुंबई भगवामय झाली होती.
भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. परंतु पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसखोर हे माझे बांधव नाहीत. ते भारतीय नाहीत. त्यांना ह्या देशातून हाकललंच पाहिजे. कारण, भारत म्हणजे काही धर्मशाळा नाही, असे म्हणत देशातील आणि मराठी मुस्लीम हा आमचाच आहे, असेही राज यांनी ठणकावून सांगितले.
भारतात परदेशातून मुल्ला मौलवी येतात, हे मला पोलीस खात्यातूनच समजलंय. हे जे काही घडतंय ते खूप काही मोठं घडविण्याचं षडयंत्र असल्याचं मला त्यांनी सांगितलंय, असे म्हणत यासंदर्भात केंद्र आणि राज्यातील गृहमंत्र्यांना भेटणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. तसेच, एनआरसीबद्दल जे हिंदू, दलित अन् आदिवासी आहेत, त्यांना पुरावे मागू नये, असेही ते म्हणाले. देशभरात ज्यांनी मोर्चे काढले त्यांना हे मोर्चातून दिलेलं उत्तर आहे. तुम्हाला जे स्वातंत्र्य मिळालंय ते जगातील कुठल्याही देशात मिळत नाही. सर्वांनी एकोप्याने राहिलं पाहिजे. जो माझा देशप्रेमी मुसलमान आहे, जो माझा मराठी मुसलमान आहे, त्यांनीही जागृत राहिलं पाहिजे. जे काही चाललंय ते त्यांनीही पुढे येऊन सांगितलं पाहिजे, असे राज ठाकरे यांनी सांगितले