भुसावळ- राज्याचे माजी महसूल मंत्री आणि वरिष्ठ भाजपा नेते एकनाथ खडसे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. भुसावळ येथे लेवा पाटील समाजाच्या कार्यक्रमात बोलताना खडसे म्हणाले की, कोणावरही तो एकापक्षामध्ये कायम राहणार असा शिक्का नसतो. त्यामुळे कोणीही गृहित धरु नये असे विधान एकनाथ खडसे यांनी केले आहे. खडसे यांच्या विधानामुळे ते पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
भुसावळमधील या कार्यक्रमाला काँग्रेसचे माजी खासदार उल्हास पाटीलही
उपस्थित होते. उल्हास पाटील यांनी खडसेंना पक्ष प्रवेशाचे निमंत्रण दिले.
आतापर्यंत भाजपामध्ये तुमच्यावर बराच अन्याय झाला आहे. त्यामुळे तुम्ही
काँग्रेसमध्ये प्रवेश करा असे उल्हास पाटील म्हणाले. महाराष्ट्र काँग्रेसचे
प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आधीच खडसेंना काँग्रेस प्रवेशाचे निमंत्रण दिले आहे.
दरम्यान , मंत्रीपदाचा
राजीनामा द्यावा लागल्यापासून एकनाथ खडसे पक्षावर नाराज आहेत. वेळोवेळी त्यांनी
आपल्या मनातील भावनाही बोलून दाखवल्या आहेत. समाजाला भक्कम करण्यासाठी प्रत्येकाने
अन्यायाविरुद्ध लढा दिला पाहिजे असे ते म्हणाले. एकनाथ खडसे स्वत: लेवा पाटील
समाजातून येतात. एकनाथ खडसे खरंतर महाराष्ट्रातील भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक
आहेत. पण एमआयडीसी जमीन घोटाळयाच्या आरोपामुळे त्यांना २०१६ मध्ये मंत्रीपदाचा
राजीनामा द्यावा लागला.